Wednesday, December 21, 2011

राज ठाकरे आणि बेळगाव - माझे काही प्रश्न!

मी खरं तर मनसे आणि राज साहेबांचा फार मोठा चाहता आहे, पण बेळगाव प्रश्नाबाबत पर्वा ते जे काही बोलले, त्याने माझी घोर निराशा केली आहे. कधी, कुठे, काय बोलायचं? आणि कुठे न बोलता गप्प राहायचं! हे राज ठाकरे यांना खरं तर खूप छान जमत होतं. त्यामुळेच तर मी त्यांच्याकडे फार मोठ्या अपेक्षेने पहात होतो. पण अलिकडच्या काळातील त्यांची विधानं पाहता, त्यांची लय आता हरपू लागली आहे, अशी शंका येते. मी माझ्या फेसबुक प्रोफाईलवरील Political View मधून मनसेला काढून टाकलं आहे. आता "फक्त मराठी", मग जो कोणता पक्ष या विचाराला साथ देईल, त्याला माझी साथ असेल. जर कोणीच साथ दिली नाही, तरी मी माझ्या विचारसरणीवर ठाम असेन.

ज्या व्यक्तिवर मराठी लोकांचा इतका जीवापाड विश्वास, ती व्यक्ति असं बोलूच कशी शकते? पण मला याचं आश्चर्य वाटत नाही. कारण मी कोणावर डोळे झाकून निष्ठा ठेवत नाही. पण जी लोकं असा डोळे झाकून विश्वास ठेवतात, ते उद्या बेळगाव कर्नाटकातच राहिलेला बरा म्हणतील, त्याचं काय!? राज ठाकरे बेळगावबाबत काहीच कसं बोलत नाहीत, याचं मला इतके दिवस आश्चर्य वाटत होतं! आणि आता वाटतं, ते का बोलले!? त्यापेक्षा ते त्या प्रश्नावर काहीच बोलले नसते, तर खूप बरं झालं असतं. त्यांनी जी विधानं केली त्यामध्ये वैचारीकतेपेक्षा शिवसेनाचा आकास यावेळी अधिक दिसून आला. हे ते राज ठाकरे नाहीयेत ज्यांना मी ओळखतो.

राज ठाकरे यांच्या विधानांच्या अनुषंगाने मला त्यांना काही बोलायचं आहे, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत :


*कर्नाटकचे सरकार बेळगावासीयांना सगळ्या सुखी-सोयी देणार असेल, तर बेळगाव कर्नाटकातच राहू द्या. - राज ठाकरे.*

(मग उद्या पाकीस्तान काश्मिरच्या जनतेला सुखात ठेवण्याची हमी देईल, देऊन टाकूयात का काश्मिर पाकिस्तानला!? नाहीतरी बेळगावपेक्षा काश्मिरप्रश्नाने कितीतरी अधिक लोकं रोज मरत आहेत, काश्मिर पाकिस्तानला दिला की प्रश्नच सुटला!)

*५५ वर्ष झाली तरी प्रश्न सुटत नाहीत, मग आपण प्रॅक्टिकल विचार करुन तो प्रदेश कर्नाटकातच राहू द्यावा - राज ठाकरे* 

(५५ वर्षं प्रयत्न करुन भारताने स्वातंत्र्याची आस सोडून प्रक्टिकल विचार करुन ब्रिटिशांच्या राजवटीत, पारतंत्र्यात सुख-समाधान मानून रहायला हवे होते का!? भारताला स्वातंत्र्य मिळायलाही १५० वर्ष लागली.)

*नाहीतरी महाराष्ट्रात इतके प्रश्न आहेत, त्यापेक्षा बेळगाव कर्नाटकातच राहू द्या! - राज ठाकरे* 

(प्रश्न कुठे नसतात हो!? भारतातही प्रश्न आहेत, मग देऊन टाका काश्मिर पाकिस्तानला. नाहीतरी कर्नाटक म्हणजे काही कॅलिफोर्निया नाहीये, की तिथे सुखात रहायला मिळतं! अब्जावधी रुपयांचा खाण घोटाळा तिथेच झालेला ना!)

*तिथल्या जनतेने इथे येऊन निराश होण्यापेक्षा तिथेच मिळूनमिसळून रहावं - राज ठाकरे*

(हे ठरवायला तिथली जनता समर्थ आहे. "ही ‘श्री’ची ईच्छा!" या आपल्या आत्मचरित्रात मूळचे बेळगावचे असलेले प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास ठाणेदार यांनी म्हटलं आहे, ‘मी तर बेळगावचा प्रश्न माझ्यापुरता कधीच सोडवला आहे, आणि तो महाराष्ट्राचा आहे, मी महाराष्ट्राचा आहे.’ ज्या अर्थी बेळगावचं आंदोलन गेली ५५ वर्षं धगधगत आहे, त्यावरून तिथल्या जनतेची ईच्छा काय आहे? ते स्पष्ट होतं. राज ठाकरे यांचं वक्तव्य बेळगावमधील स्वातंत्रप्रेमी मराठी जनतेचा आणि सबंध महाराष्ट्राचा घोर अपमान करणारं आहे.)

*बेळगावमधील मराठी लोकांना कन्नड यायलाच हवं - राज ठाकरे*

(अहो! संबंध काय आहे!? जो प्रदेश मुळात कर्नाटकचा नाहीयेच, तो मराठीवर अन्याय करुन, आकसाने महाजन आयोगाने त्यांना दिला, आणि परत त्यांचीच भाषा शिकायची? का तर म्हणे तो आता त्यांचा प्रदेश आहे!? बेळगाव हा खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचा आहे, तो कर्नाटकात घातला गेला म्हणून केवळ तिथल्या मराठी लोकांनी कन्नड शिकावं! याला काहीच अर्थ नाही. हा कसला विचार? यामागे काही तर्क सापडत नाही!) 

इथे जर कोणाला वाटत असेल, बेळगाव आणि आपला संबंध काय!? तर मी म्हणेन, अहो! बेळगावशी आपला जरा तरी संबंध आहे, पण काश्मिरशी आपला लांब लांब पर्यंत तरी काही संबंध काय!? तिथे कायद्याने आपण एक फुट जमिनही विकत घेऊ शकत नाही. मग का लढत आहोत आपण काश्मिरसाठी? आहे उत्तर!? मग आता सांगा बेळगावसाठी का लढायचं नाही? आपण खरं तर बेळगावसाठी जास्त लढलं पाहिजे. शेवटी शेवटपर्यंत लढणं महत्त्वाचं आहे, हरणं किंवा जिंकणं नंतर आलं. उगाच शिवसेनाला विरोध करायचा म्हणून वाटेल ते काहीही बडबडण्याला काय अर्थ आहे?

मला अशी शंका येते की, राज साहेबांचा इगो काही कारणाने दुखावला गेला असावा. कारण शिवसेना, बेळगाव, महाराष्ट्र एकिकरण समिती, असं काहीसं दृष्य नेहमी पाहायला मिळतं. आणि त्यामुळेच त्यांनी अशी महाराष्ट्र विरोधी भुमिका घेतली. पण ज्याला खरंच मराठीविषयी आत्मियता आहे, तो काही झालं तरी असं बोलेल का? राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे माझ्यासारखे त्यांचे बरेच चाहते आता नक्कीच कमी झाले असणार. फेसबुकवरील प्रतिक्रियांमधून देखील हेच समोर येत आहे. राज साहेब! इतके दिवस जे कमवलंत, ते असं का घालवलंत?

पण ठाणेदार यांच्याप्रमाणे मी देखील बेळगाव प्रश्न माझ्यापुरता सोडवला आहे. बेळगाव, निपाणी, कारवार, बिदरचा काही भाग, डांग हा सर्व महाराष्ट्राचाच प्रदेश आहे. मी माझ्या परीने नेहमीच संयुक्त महाराष्ट्राच्या या आंदोलनाला पाठिंबा देत राहिन. भविष्यात येणार्‍या पुढील पिढीला याबाबत सांगत राहिन. आजचा हा लेख देखील त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. या लेखाने काय होणार? ..काही होईल किंवा नाही होणार.. उद्या कदाचीत आपण हरलो.. तरी माझ्या मनात तेंव्हा मी जिंकलो असेन, कारण शेवटी मी मनापासून प्रयत्न केला. विजय येईल किंवा पराभव होईल, पण मी राज ठाकरे यांनी सांगितलेला प्रक्टिकल विचार केला नाही, याचा माझ्या मनात आनंद असेल. पण लढताना पराभवाचा विचार करायचाच कशाला? केवळ ध्येयवेडं होऊन विजयाची उज्वल स्वप्न पहात लढायचं असतं!

बेळगावप्रश्नी हृदयाला हात घालणारे चित्र - कृष्णावतार घेणार कोण?
संयुक्त महाराष्ट्राचा कर्नाटकात डांबलेला हक्काचा प्रदेश लाल रंगात - हा प्रदेश महाराष्ट्राचाच आहे.
चित्रांसाठी - "एक मराठी माणूस" या ब्लॉगचे आभार 

Wednesday, September 7, 2011

प्रवृत्ती, गैरसमज आणि नात्यांचे धागे

त्यादिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास मी माझे फेसबुकचे खाते उघडून बसलो होतो. इतक्यात फेसबुक चॅटच्या छोट्याशा खिडकीत मला माझा एक चांगला मित्र ऑनलाईन असलेला दिसला. खरंतर फेसबुक चॅट मध्ये सहजासहजी अदृश्य (invisible) राहता येत नसल्याने, मी शक्यतो ऑफलाईनच असतो, पण अधूनमधून कोणी प्रिय व्यक्ती ऑनलाईन आहे का!? ते पाहण्यासाठी मी ऑनलाईन येऊन जातो. मी माझ्या मित्राला चॅट खिडकीतून ‘hi’ केलं, इतक्यात तो परत ऑफलाईन गेला. तो असा कसा ऑफलाईन गेला!? म्हणून मी त्याला सहज म्हणून लगेच फोन केला. तर त्याने मला सांगितलं की, तो बाहेर फिरत आहे. मी म्हटलं, ‘अरे! तू तर आत्ता काही सेकंदांपूर्वी ऑनलाईन होतास!’ तेंव्हा एकंदरीत काय घडलं असावं! ते दोघांच्याही लक्षात आलं. नक्कीच त्याच्या रुमपार्टनरने त्याचं फेसबुक खातं उघडलं होतं. ‘अरे! मी फेसबुक उघडलं होतं कंपनीच्या कॉम्प्युटरवर आणि इतक्यात लाईट गेली. म्हणून मी बाहेर फिरायला आलो.’, तो मला म्हणाला. लाईट पुन्हा परत आली असणार! आणि हा तर लॉग-आऊट झाला नव्हता! त्याचा रुमपार्टनर जेंव्हा संगणकावर बसला, तेंव्हा माझ्या मित्राचे फेसबुक खाते उघडले गेले असणार! आणि मग याच्या रुमपार्टनरला काय! त्याला तर तेच पाहिजे होतं! दुसर्‍याला विनाकारण त्रास देणं आणि त्यातून आसुरी  आनंद मिळवलं. 

कॉलेजमध्ये असताना याने मला देखील त्रास दिला होता. विनाकारण मुला-मुलींसमोर असे मोठ्याने कमेंट्स करायचे की, ज्यामुळे माझी बदनामी होईल आणि गप्प बस्स म्हटलं, की तेच अधिक अक्रस्ताळेपणाने अधिक करायचे! हा एका वाळूठेकेदाराचा मुलगा! असुरी आनंदात समाधान मानणारा! सायको! आपण शांत असाल, तरी तो स्वतःहून आपल्याला त्रास द्यायला सरसावेल, अशा प्रवृत्तीचा! काय होईल? काय वाटेल? याचा अजिबात विचार नाही. दुसर्‍याचं नुकसान करणे यातच धन्यता मानणारा! कॉलेज संपल्यानंतर याने चार-पाच मुलांना आपल्या ओळखीने जॉब लावून दिले, त्यामुळे मागचं सगळं विसरुन माझ्या मनात त्याच्याबद्दल काही काळ आदर निर्माण झाला होता. पण मध्यंतरी त्याने जे माझ्या मित्राबरोबर केलं, त्यामुळे मला पुन्हा एकदा हाताश केलं आहे. माझ्या या ‘अतिशय भोळ्या’ मित्राला त्याने जॉब लावून दिला, पण शेवटी ‘असंगताशी संग आणि प्राणाशी गाठ!’. आपला काही फायदा होत असला, तरी असल्या असंगताशी संग कधीच करु नये हेच खरे!

‘लवकरात लवकर आपल्या रुमवर परत जा!’. माझा मित्र रुमच्या दिशेने निघाला. ‘दहा मिनिटं तरी लागतील’, तो मला म्हणाला. एव्हाना त्याच्या अकाऊंट वरुन मला शिव्या आल्या होत्या. ‘तुझं बॅड लक! मी आत्ताच त्याच्याशी फोनवर बोलत होतो.’, मी त्याला म्हटलं. ‘मग मी त्याचा बाप आहे!’ तिकडून प्रतिसाद आला. अशावेळी मी माझ्या मित्राशी केलेले गोपनीय चॅट देखील उघड होण्याची भिती होती. त्यावेळी दुसर्‍या एका मित्रालाही या अकाऊंट वरुन शिव्या गेल्या होत्या, हे मला नंतर समजलं. तसा तोही माझ्या मित्रावर चिडला. त्याचं म्हणनं होतं, ‘आपण काही केलं नाही, काही नाही आणि हा का आपाल्याला उगाच शिव्या देत आहे!?’ तसा जाब विचारण्यासाठी याने लगेच त्याला फोन केला, तेंव्हा यालाही त्याचे अकाऊंट हॅक झाल्याचे समजले.

कहर तर तेंव्हा झाला, जेंव्हा माझ्या मित्राच्या मैत्रिणींना त्याच्या रुमपार्टनरने याच्या फेसबुक अकाऊंट वरुन ‘प्रपोज’ टाकले. यामुळे इतका मोठा गैरसमज निर्माण झाला की, त्याच्या मैत्रिणींनी त्याला फेसबुकच्या मित्र यादीतून तर उडवलेच, शिवाय त्याच्याशी कायमचं बोलणं बंद करुन टाकलं! याचा त्याला फार मोठा धक्का बसला. कारण काहीही केलं नसताना त्याची बदनामी होत होती व त्याला ही शिक्षा मिळत होती. मागे या रुमपार्टनरने एका मुलीच्या नावाने एक खोटं फेसबुक खातं उघडलं होतं आणि सर्वांना मित्र विनंती पाठवली होती. जेंव्हा मी ते खातं पाहिलं, तेंव्हाच मला ते खात्रीने खोटं असल्याचं लक्षात आलं होतं. मी सर्वांना त्यास अनफ्रेंड करण्यास सांगितलं होतं. कारण सर्वांमध्ये आपापसात ‘गैरसमज’ निर्माण होण्याची चाहूल मला लागली होती. ‘तुझ्या मैत्रिणींनाही त्या खोट्या खात्यातून अनफ्रेंड व्हायला सांग!’, मी माझ्या मित्राला त्याचवेळी सांगितलं होतं. तसं त्याने ते त्यांना सांगितलंही होतं, आणि त्या अनफ्रेंड झाल्याही होत्या. पण या नवीन प्रकरणानंतर त्यांना असं वाटू लागलं, की ते फेक अकाऊंटही माझ्या मित्रानेच काढलं होतं. एखाद्या सिनेमातला अथवा कार्यक्रमातला प्रसंग असावा, त्याप्रमाणे सारं काही घडत होतं. बेंबीच्या देठापासून कितीही बोंबलून ‘तो मी नव्हेच, अकाऊंट हॅक झालं होतं’, असं खरं सांगण्याचा प्रयत्न केला, तरी त्यावर कोणी विश्वास ठेवायला तर तयार नव्हतं, आणि शिवाय तो खोटी कारणं देत आहे, असंच सगळ्यांना वाटत होतं.

त्याने सकाळपासून तिला फोन केले, sms केले, पण तिने प्रतिसाद दिला नाही. नंतर तर तिने आपला मोबाईलच स्विच ऑफ करुन टाकला. तिची मैत्रिणही त्याचा फोन उचलायला तयार नव्हती. तिनेही याला अनफ्रेंड करुन टाकले होते. त्याने खरोखर प्रपोज केला असता, तरी तिच्या मैत्रिणीने तरी त्याचं एकदा ऐकून घ्यायला काहीच हरकत नव्हती. हे ऐकमेकांना सहा महिन्यांपासून खूप चांगलं ओळखत होते. डेजमध्ये, सबमिशनमध्ये यांनी एकत्र काम केलं होतं. ऐकमेकांना मित्र म्हणत होते! आणि मैत्री अशी असते? ज्यात विश्वासाचा लवलेशही नाही! याला मैत्री म्हणता येणार नाही, गरजेपुरती गरज म्हणता येईल. त्यादिवशी माझा मित्र प्रचंड अस्वस्थ होता. माझं आणि त्या मुलींचं आधीपासूनच काही चांगलं रिलेशन नव्हतं, त्यामुळे  खूप मनापासून ईच्छा असूनही मी त्याच्यासाठी काही करु शकत नव्हतो. काही करता येण्याजोगे दोन मित्र होते, पण त्यांनीही आपले हात झटकले आणि या प्रकरणातून आपलं अंग काढून घेतलं! त्यादिवशी फक्त मीच त्याचा फोन उचलत होतो आणि त्याला आधार देत होतो. माझ्या मते त्या मुलींनी त्याच्याशी कायमचं बोलणं बंद केलं तरी काही हरकत नाही, पण अशा गैरसमजातून हे व्हायला नको होतं. 

शेवटी कसं आहे!? नात्यांचे धागे कच्चे असतात किंवा पक्के! ते दोन व्यक्तिंना बांधून ठेवतात. घटना आणि प्रसंग त्या धाग्यांच्या मजबूतीला तोलतात. हे नातं आधिपासूनच कुचक्या धाग्यांनी बांधलं गेलं होतं. त्यामुळे हा प्रसंग तर केवळ निमित्त होतं, जर या नात्यात खरीच ताकद असती, तर ते कधीच तुटलं नसतं.